Wednesday 17 June 2020

कोरोना नंतरचे जग - धर्मस्थळे

दिनांक १७/०६/२०२०

कोरोना नंतरचे जग - धर्मस्थळे 

कोरोना महामारीने जगाला आणि आपल्या सर्वांना अंतर्बाह्य हलवले आहे, सगळीकडे सर्व स्तरावर कोरोना नंतरचे जग कसे असेल ह्या विषयी चर्चा आणि तदनुषंगिक पावले उचलणे सुरु झाले आहे. 'कोरोना नंतरचे जग' ह्या विषयावर घडणाऱ्या काही चर्चासत्रात सहभागी होणे होते आहे त्यामुळे त्याविषयी काही विचार मनात येत आहेत त्यातूनच हे लिखाण -

२५ मार्चला लॉकडाउन जाहीर झाले आणि सर्व धर्मस्थळे बंद करण्यात आली, ती बंद नसती केली तरी लॉकडाउन असल्यामुळे कुणाला घरातून बाहेर निघून धर्मस्थळी जाणे शक्य नव्हते, १ मे पासून लॉकडाउन मध्ये सवलती देणे सुरू झाले पण धर्मस्थळे उघडण्याची सूट सरकारने दिली नव्हती, शेवटी ८ जून पासून धर्मस्थळे उघडण्याची सवलत देण्यात आली आहे आणि ती उघडली आहेत. धर्मस्थळे उघडल्यावर तुम्ही मंदिरात जाणार का ? ह्या प्रकारची पहाणी करण्यात आली आणि ५४ टक्के लोकांनी धर्मस्थळे उघडली असली तरी सध्या आम्ही तिथे जाणार नाही असे सांगितले.

सरकारने धर्मस्थळे उघडली पण खरे पाहता इतर अनेक गोष्टी उघडण्याची मागणी करणारे लोकं  धर्मस्थळे उघडण्याची मागणी उघडपणे करताना दिसली नव्हती, ना ते रस्त्यावर आले होते, ना तसे आवेदन केल्याचे टीव्हीवर वा वर्तमानपत्रात आले नव्हते, माध्यमान मध्ये  तशी चर्चा होते आहे असेही नव्हते ह्या साऱ्यामुळे मला भाबडेपणाने असे वाटत होते की दोन महिन्याहून अधिकच्या लॉकडाउन मध्ये  आत्ममंथनाची अशी न भुतो न भविष्यती संधी आपणासर्वांना प्रथमच मिळाली होती त्यामुळे लोकांना जाणवले असेल की देवाची भक्ती करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही,  घरात पूजा केली किंवा नुसती त्याची मनोमन प्रार्थना केली तरी पुरेशी आहे.  देव चराचरात आहे, देव भावाचा - भक्तीचा भुकेला आहे, देवाच्या भक्तीसाठी मंदिरात जाण्याची, कर्मकांड करण्याची गरज नाही इत्यादी सर्व संतानी  दिलेल्या शिकवणींची प्रचीती लोकांना आली असेल आणि म्हणूनच मंदिरे उघडण्याची मागणी लोकं करीत नाहीयेत असे मला वाटले पण माझी समजूत चुकीची होती. धर्मस्थळे उघडली आहेत, भक्त जाऊ लागले आहेत काही दिवसात धर्मस्थळे पूर्वीसारखी भरून व्हावू लागतील.

सरकारने मंदिरे उघडण्याची सवलत दिली त्यात सरकारचे चुकले असे मुळीच नाही - दुकाने, दारूची दुकाने, ऑफिसेस, मोल्स इत्यादी उघडण्याची सवलत दिली आहे तेंव्हा धर्मस्थळे उघडण्याची सवलत न दिली असती तर सरकारचे चुकले असते. शेवटी धर्मस्थळावर अगदी भिकाऱ्यापासून, गरीबांपासून, व्यापाऱ्यांपासून ते थेट विशिष्ट प्रकारच्या श्रीमंतांची / लोकांची आजीविका अवलंबून असते.

लॉकडाउन मध्ये लोकं मंदिरात आली नाही म्हणून देवाने कोणाचे वाईट केले नाही कारण तो परम कृपाळू आहे, मंदिरात दानधर्म केला नाही म्हणूनही कोणाचे वाईट केले नाही, तो तर नुसती मनोभावे केलेली प्रार्थना गोड मानून घेणारा आहे. ज्या लोकांनी लॉकडाउन मध्ये माणुसकीचा धर्म पाळला, गरजूंना मदत केली त्यांच्या पदरी त्याने
नक्कीच दामदुप्पट पुण्य घातले असणार.

बराच प्रमाणात लॉकडाउन उठविण्यात आला आहे पण अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे सांगितले जाते आहे त्या रितीवर सगळ्यांना सांगावेसे वाटते अगदी आवश्यक वाटेल तेव्हांच धर्मस्थळी जरूर जा आणि मनातल्या भावभक्ती व्यतिरिक्त आपल्याकडील इतर जे देवाला द्यावेसे वाटते आहे ते धर्मस्थळी न देता गरिबांना, गरजून द्या, तो चराचरात आहे तेंव्हा ते त्याला नक्कीच पोचेल.

धर्मस्थळे सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि तेथे येणाऱ्या भक्तांना मुलभूत सुविधा, स्वच्छता देण्यासाठी खर्च येतो तेवढा धर्मस्थळाना भक्तांकडून दान रूपाने मिळावा पण जेंव्हा गरजेपेक्षा प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो तेंव्हा धर्मस्थळे फक्त पुजास्थळे - भक्तीस्थळे न रहाता व्यापाराची, आर्थिक आणि राजकीय सत्तेची केंद्र बनतात. हल्ली अनेक धर्मस्थळे भक्तांकडून मिळालेल्या ह्या अतिरिक्त दानातून - शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स आणि अनेक समाज उपयोगी कार्य करतात पण हे सारे कार्य आणि त्यासाठी होणारा खर्च त्यांना मिळणाऱ्या दानाच्या रकमे समोर खूप कमी असतो. धर्मस्थळे मिळालेल्या दानाची रक्कम किती आणि कशावर वापरतात ह्या पेक्षाही महत्वाचे हे आहे की धर्मस्थळानी हे सारे करणे तत्वतः चुकीचे आहे कारण हे सारे करण्यातून एक मोठे संस्थान उभे होते, दिवसेंदिवस ते वाढत जाते, त्याची आर्थिक आणि राजकीय सत्ता / ताकत वाढत जाते. धर्मस्थळे ही भक्ताला शांतपणे, प्रसन्नपणे देवाची भक्ती करता येण्याची, चांगला वेळ घालविण्याची, एकमेकांशी संवाद करण्याची सामाजिक स्थळे असली पाहिजेत, ती राजकीय, आर्थिक सत्ता केंद्र होणे सर्वथा चुकीचे आहे. 

काही दिवसापूर्वी श्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी धर्मस्थळा कडील अतिरिक्त पैसा (जो एक लाख करोड हून अधिक भरेल) सरकारने  कोरोना महामारीशी लढण्यासाठी काही काळासाठी व्याजाने घ्यावा असे सुचवले आणि त्याला अर्थातच विरोध झाला आणि सरकारने तसे काही केले नाही. मी तर पुढे जाऊन म्हणेन की आजमितीस धर्मस्थळाकडे असलेला सगळा अतिरिक्त पैसा सरकारने घेऊन कोरोना महामारीसाठी वापरावा आणि पुढील वर्षांमध्येही वर  म्हटल्याप्रमाणे धर्मस्थळ सुस्थित ठेवण्यापुरता पैसा देऊन दरवर्षी प्राप्त होणारा अतिरिक्त पैसा एक खास निधी निर्माण करून त्यात जमा घेऊन गरिबांसाठी वापरावा.

कोरोना नंतरच्या जगात  धर्मस्थळांच्या बाबतीत असे घडावे ..........

No comments:

Post a Comment