ब्लॉग दिनांक २६/०१/२०१६ - कविता –
गावातले घर म्हणाले .......
कोकणात मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा ह्या गावानंतर गोव्याच्या दिशेला गेल्यावर येते पाली गाव आणि तेथून चार – पाच किमी वर असलेले असोडे
हे आमचे गाव. अंदाजे १३० वर्षापूर्वी ह्या गावी आमचे पूर्वज आले असावे. गावातले
१९०५ साली बांधलेले घर, जे १९९४ पर्यंत पूर्णपणे राहते होते ते गेल्या पाच-सहा वर्षात पडू लागले आणि ते पुन्हा दुरूस्त करण्याचे
आयोजन करण्यासाठी जे गावी जाणे झाले त्या वेळेस घराशी मनात एक संवाद घडत होता, २९-३०
डिसेंबर २०१५ च्या शेवटच्या भेटीत घर दुरुस्त करण्याचा निश्चय झाला आणि हा संवाद
एक प्रकारे पूर्ण झाला ..... गावातल्या घराशी मनात झालेला संवाद मांडणारी ही कविता
.......
कविता – गावातले घर म्हणाले .......
(कविता लेखन – दिनांक १८/०१/२०१६, सकाळ
ते दुपारी ३.० पर्यंत, उज्जैन मध्ये)
“ का येता तुम्ही सारे पुन्हा पुन्हा
माझे हे झिजत संपणे पहायला?
एकदाच संपूर्ण पाडून संपवा ना
हे हाल तुमचे आणि माझे “.......
वर्षांच्या मौनानंतर बोलले अखेरीस
मला
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....
“ आज न उद्या कधीतरी
संपणारच ना अस्तित्व माझे – तुमचे
मग का अडकला आहे जीव तुमचा माझ्यात
पाडून टाकून छोटेसे देवघर ठेवा
लोकांचा हा सल्ला योग्यच आहे ऐकावा “
पुढे म्हणाले मला
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....
“ कोणासाठी टिकवू पाहता आहात मला
कमी जास्त जोडलेली आहे नाळ
माझी तुमच्या पिढीशी, तुमची माझ्याशी
पण जोडलीत नाहीत नाळ तुम्हीच
माझी पुढल्या पिढीशी ”
रोखठोक सुनावत म्हणाले मला / (कान उघडणी करत )
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....
“ आमच्यासाठी टिकवू
पाहतो आहे तुला
आमच्या आधी तुझे संपणे नकोय आम्हाला’
बदलली आहे पिढी पुढची
जुळण्या तुझी नाळ त्यांच्याशी
टिकवू, थोडासा बदलू पाहतो आहे तुला ”
अंतरीच्या उमाळ्याने, आर्जवाने
उत्तरलो कोसळू लागलेल्या गावातल्या घराला
या भेटीत माझ्या ....
“ येणार असाल जर तुम्ही
सारे
जगण्या आळी पाळीने सोबत माझ्या
जोडणार असेल नाते पुढच्या पिढीशी
तर आहे मी तयार नव्याने उभारी घ्यायला
घडायला, बदलायला, सजायला ”
उत्साहाने म्हणाले मला
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....