Wednesday 17 December 2014

कविता – वाडा

दिनांक - १७/१२/२०१४ 
वयाच्या ५ ते ७ या वर्षांमध्ये (१९६६ ते १९६८) मी कोकणात कासार्डे या कणकवली जवळच्या गावी आजी बरोबर ज्या वाड्यात राहिलो होतो त्या वाड्याला १९७१ साली भेट दिली होती. मग तिथे माझे कधीच जाणे झाले नाही.  अचानक नोव्हेंबर १९९१ मध्ये गोव्याहून परतताना मावळतीच्या सुमारास त्या वाड्याला भेट देण्याचा योग आला. वाड्यासमोर उभा राहिलो आणि जे अनुभवले ते मांडू पहाणारी ही कविता .....

कविता – वाडा

मनात वर्षानुवर्षे

पिंपळपानासारखा जपलेल्या वाड्यासमोर

उत्सुक, आतुर, धडधडत्या हृदयाने पोचलो

भव्य चिरेबंदी वाड्याचे होते

भग्नावशेष विखुरलेले चहूकडे

बालपणीच्या तरल भावस्मृतींचे फ्रेस्को

खळ्ळकन फुटले छिन्नविछिन्नले चहूकडे         ||


मनात कुठेतरी प्रचंड पडझड झाली 

खोलवर एक जीवघेणी कळ उठली

सागर संमिश्र आवेगांचा उधाणाला   

झिरपला कंठात, डोळ्यात ओलावा         ||


वाड्याच्या भग्नावेशातून अधीरपणे फिरलो

एकनएक कानाकोपरा चाचपला

ओळखीच्या साऱ्या खुणा शोधल्या

जुळवल्या आठवणी बालपणीच्या विखुरलेल्या             ||


डोळ्यात तरळलेल्या अश्रूंच्या बिल्लोरी काचेने

एकसंधला वाडा पुन्हा,  सजीवले वातावरण सारे

कानातले डूल झुलवत

इवल्याश्या पावलांनी बागडू लागलो

बोबड्या बोलातले श्लोक

आजीने सांगितलेल्या गोष्टी

नवजात भावाचे रडणे ऐकू लागलो 

पायात घोटाळणाऱ्या भाटीच्या

गोजिरवाण्या पिल्लांशी खेळू लागलो

अंगणातल्या गारा वेचू लागलो            ||


काही क्षणातच गारांचे पाणी झाले

ओंजळीतून ओघळून गेले

ढाण्या कुत्र्याने पिल्लांना मारले

कानातले डूल निघाले,

बोबडे बोल, बालपण संपले

नकळत वाडा सोडणेही झाले

एकेक चिरे निखळले,

वासे कलथून गेले

वाडा भंगला पुन्हा, फलॅशबॅकही संपला

डोळ्यात तरळणाऱ्या आठवणी अश्रू होऊन ओघळता             ||


पुन्हा आम्ही दोघेच उरलो ...


उध्वस्त वाडा, सजीवपण हरवलेला

मी, वाड्यासोबत बालपण हरवलेला  ||

1 comment: