Friday 5 December 2014

कविता – संकेत आपला ठरलेला आणि कविता तू माझा सांगाती

दिनांक - ५/१२/२०१४

गेले काही महिने माझ्या सर्व जुन्या कवितांचे त्यांना ब्लॉगवर ठेवण्याआधी म्हणजेच लोकांपुढे आणण्याआधी त्यांचे पुनर्लेखन  करतो आहे. कवितेचे पुनर्लेखन सुरु करताना ते सोपे वाटले होते कारण ही सहज प्रक्रिया आपण करतोच, कविता किंवा कुठलेही लेखन लिहिल्यावर ते लेखन आपण लगेच किंवा अल्प मुदतीतच  revise अथवा सारखे करतो. असे करताना अनेक वेळा ते पुन्हा लिहितो, काही वेळा ते पूर्ण बदलूनही जाते पण ह्या साऱ्या प्रक्रियेत एक सलगता, एकसंधता असते आणि पुनर्लेखनाची प्रक्रिया वेगळी अशी कळतही नाही.

माझ्या कविता मी जेंव्हा लिहिल्या तेंव्हा त्यांना सारख्या न करता, त्यांच्या कडे पुन्हा वळूनही न पाहता  १० ते २० वर्षापर्यंत तश्याच ठेवून दिल्या होत्या. ह्या वर्षी अचानक मनात आले आणि हा कवितांच्या पुनर्लेखनाचा प्रकल्प हाती घेतला पण आता कळले आहे अनेक वर्षांनी जर कृतीचे /कवितेचे पुनर्लेखन करावयास घेतले तर ही प्रक्रिया नव्या सृजना इतकीच आपल्याला  स्वतःच्या अंतरंगात उतरायला लावणारी, स्वतःला आरश्यासमोर उभे करणारी, एक प्रकारे वेदनामय आणि तरीही सुखकारक, समृद्ध करणारी असते.

खर तर प्रत्येक कविता पुनर्लेखन करताना कमी जास्त प्रमाणात बदलून जाते आहे, अनेकदा मनात प्रश्नही उभे करते आहे की पुनर्लेखन केलेली कविता ही मूळ कवितेशी प्रमाणिक आहे का की पूर्णच बदलून गेली आहे. स्वतःच्याच कविता revise करतो आहे, सारख्या करतो आहे म्हणून हे प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणाराही मीच आहे, अन्यथा असल्या प्रश्नांची उत्तरे देणे अवघड आहे.

पुनर्लेखन करता नव्या कल्पना तर सुचतातच, आधी न उमजलेला अर्थ, दृष्टीकोन समजतो आहे पण काही वेळा तर मूळ कवितेची जोड कविता अथवा भाग २ अश्याही कविता होत आहेत. कालही तसेच झाले 'संकेत आपला ठरलेला' ही कविता सारखी करावयास घेतली आणि नवी कविताच सुचू लागली. मग काय कालचा संपूर्ण दिवस 'तू माझा सांगाती' ह्या नव्या कविते मागे गेला आणि मग आज 'संकेत आपला ठरलेला' ही कविता पुनर्लेखीत झाली. अर्थात ही नव्याने सारखी करताना कालच्या नव्या कवितेच्या कल्पनांचा फायदा झाला.

अश्या या दोन जोड कविता एक १५ - २० वर्षापूर्वीची आणि एक नवी गेल्याकालची .............


कविता – संकेत आपला ठरलेला 


प्रत्येकाला तू सावलीसारखा चिकटलेला

श्वासोच्छवासा इतका अस्तित्वाचा भाग असलेला

सुखी असतात ते, ज्यांना भान नसते तुझ्या अस्तित्वाचे
कळतही नाही तुझ्या हातून मिटणे त्यांच्या अस्तित्वाचे    ||

काहींना जाणवते तुझे हे सावलीरूपी अस्तित्व
तुझ्यापासून सुटण्याची त्यांची केविलवाणी धडपड
तू पिसाळतोस अन बसतोस त्यांच्या मानेवर       
भयगंड होऊन सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखा             ||

तुझे माझे संबंध मैत्रीचे, निर्भेळ संवादांचे
हातात हात धरून चालण्याचे, गळ्यात गळा घालण्याचे
बदलून तुझी रूपं मनासारखी माझ्या
न चुकता पाळतोस धर्म संवगड्याचा                   ||

संकेत ठरलाच आहे आपला
घेऊन जा केव्हाही घरी तुझ्या खेळायला
तो पर्यंत जगून घेतो जगाला
खेळून घेतो जीवनाला                               ||

कधीतरी पाहून होईल काना कोपरा ह्या जगाचा  
तेंव्हा तूच दाखव रस्ता पारदर्शक तुझ्या घराचा
स्वतःहून येईन तुझ्याकडे सोडून या खेळाला

हाही संकेत आपला ठरलेला                       ||            

(मूळ लेखन १९९५ पुनर्लेखन ०५/१२/२०१४ पहाटे १.० ते २.०)


कविता - तू माझा सांगाती 


नकोश्या तुला, कल्पनेतही विसरू पाहणारे
अशक्य असूनही सारे तुला टाळू पाहणारे
तुझ्यापासून दूर पळणारेच बहुतेक सारे      ||

मोजकेच धर्म, देशासाठी तुला कवटाळणारे
ध्येय, प्रेमासाठी धैर्याने मात करणारे
तरीही तुझ्याशी प्रेम, संवाद नसणारे        ||  

नचिकेतानंतर साऱ्यांनी अव्हेरलेला
कुणाशी संवाद नसलेला, एकाकी पडलेला
तू, किती दचकलास, चिडलास
थयथयाटही केलास
सुरू करता संवाद मी तुझ्याशी            ||

काय हा अगोचरपणा
क्षणार्धात संपवीन तुझे अस्तित्व
गरजलास धक्का ओसरल्यावर            ||

तो एकाधिकार तुझाच
पण वेळ आल्यावरच, खरे ना
मग होऊया की मित्र तो पर्यंत
संपवण्या एकाकीपण तुझे – माझे, मी उत्तरलो     ||

धुमसत, धुसपुसत शांत झालास
गहिवरलेले ओले हसलास
एकाकीपण युगायुगांचे मिठीत संपवलेस     ||

झालास तेंव्हा पासून तू माझा सांगाती
खेळवीशी अंगा-खांद्या-मांडीवरी
शिकविशी जीवनाची गुह्ये सारी
चालविशी हाती धरुनिया                 ||

(मूळ लेखन ०४/१२/२०१४ – सकाळी ८ ते ९ मग दुपार पर्यंत )

No comments:

Post a Comment